अध्यात्मातील अनुभूती व्यक्तीला सद्गुणाकडे नेते – अरुण बोऱ्हाडे

Share this News
  • जिव्हाळा अंकाचे प्रकाशन

पिंपरी दि.२९ (सिटीनामा वृत्तसेवा)
अध्यात्मातील अनुभूती व्यक्तीला सद्गुणाकडे नेते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना अरुण बोऱ्हाडे बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, अंकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अरुण बोऱ्हाडे पुढे म्हणाले की, ‘ज्येष्ठत्वामुळे माणूस अध्यात्माकडे वळतो हे जरी खरे असले तरी वैविध्यपूर्ण साहित्य अन् उत्कृष्ट निर्मितिमूल्य यामुळे ‘जिव्हाळा’ हा वार्षिक अंक अतिशय दर्जेदार झालेला आहे!’ नंदकुमार मुरडे यांनी संपादकीय मनोगतातून अंकाची वैशिष्ट्ये कथन केली; तर अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, ‘ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत सामाजिक ऋण फेडण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मुक्त आनंदाची उधळण करण्यासाठी संघात सहभागी व्हावे!’ असे आवाहन केले.

त्रिवार ओंकार, दीपप्रज्वलन, गणेशपूजन, क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाला अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ईश्वरी पांचाळ या बालिकेने मोटरसायकलवरून सभागृहात आणलेल्या अंकाच्या प्रतींचे
तुतारीची गर्जना, टाळ, शंखनाद यांचा गजर तसेच पुष्पांची उधळण करीत मान्यवरांच्या हस्ते अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर ज्या सभासदांनी आपल्या वैवाहिक सहजीवनाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना सन्मानित करण्यात आले. जिव्हाळा अंकाच्या निर्मितिप्रक्रियेत सहभागी व्यक्ती, हितचिंतक यांनादेखील सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी, २६ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच वाढदिवसानिमित्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अथर्वशीर्ष पठण तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या महिला व पुरुष सभासदांना रोख बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भिवाजी गावडे, अलका इनामदार, नारायण दिवेकर, रत्नप्रभा खोत, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, सुनील चव्हाण, सतीश लिपारे, विजय ठकार, प्रभाकर मिरजकर, नीलिमा कांबळे, सतीश कुलकर्णी, वसंत गुजर, उषा गर्भे, राजेंद्र भागवत यांच्यासह सर्व गटप्रमुखांनी संयोजनात परिश्रम घेतले. शामकांत खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. शहाजी कांबळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *