भारताचा विकास आणि जातिभेदमुक्ती हे बाबासाहेबांचे स्वप्न : रविंद्र किरकोळे

Share this News

निगडी दि.७ (सिटीनामा वृत्तसेवा)

“जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या असून भारताचा विकास आणि जातिभेदमुक्ती हे बाबासाहेबांचे स्वप्न असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय समरसता गतिविधीचे सहसंयोजक रविंद्र किरकोळे यांनी केले.
समरसता गतिविधी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर धम्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त अँड. क्षितीज गायकवाड आणि सावरकर मंडळाचे सहसचिव शिवानंद चौगुले उपस्थित होते. किरकोळे पुढे म्हणाले की,” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासूनच जातीभेद निर्मूलनाच्या कार्याला आपल्या कार्यपद्धतीत अग्रक्रम दिला आहे. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, त्यानंतरचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीही जातीभेद निर्मूलनावर विशेष भर दिला. देवरस यांनी आंतरजातीय विवाह हे जातीभेद नष्ट करण्याचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्टपणे मांडले होते. तसेच आरक्षणाबाबत त्यांनी संबंधित समाजघटकांनीच आरक्षणाचा कालावधी ठरवावा, अशी ठाम भूमिका घेतली होती. ही भूमिका संघाच्या स्पष्ट विचारधारेचे उदाहरण आहे, “असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयी बोलताना किरकोळे म्हणाले की, बाबासाहेब संघाचे समर्थक होते की नव्हते, हा या परिषदेचा विषय नाही. बाबासाहेबांचे संघाशी काही बाबतीत मतभेद होते, मात्र त्यांची संवादी आणि आपलेपणाची भूमिका महत्त्वाची होती. आज समाजात काही लोक व संघटना महापुरुषांच्या विचारांची विकृती करून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. या वैचारिक भ्रष्टाचारामुळे समाज व राष्ट्राच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. अशा समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी बंधुता परिषदांसारखे उपक्रम आवश्यक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अँड. क्षितीज गायकवाड यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा संदर्भ देत सांगितले की, “ श्रीपाद अमृत डांगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेस पक्षाला झाला. त्या काळात काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांमध्ये आघाडी होती, हे इतिहासातून स्पष्ट होते. आजही काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांमधील वैचारिक फरक जाणवत नाही. त्या काळातील अनेक हिंदू संघटना हिंदू समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्यरत होत्या, मात्र त्यांना चुकीच्या पद्धतीने जातीवादी ठरवण्यात आले. बाबासाहेबांचे हिंदू संघटनांशी काही मतभेद असले तरी त्यांचा टोकाचा विरोध नव्हता, तर संवादाचे आपुलकीचे नाते होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेला निलेश गद्रे,हेमंत हरहरे, मुकुंद कुलकर्णी, मुकुंद आफळे, विलास लांडगे, नरेंद्र पेंडसे,डॉ.धनंजय भिसे ,प्रदीप पवार,विजय कांबळे,आशा शहाणे,नामदेव रिठे,नाना कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर यशवंत जाधव व धनंजय खुडे यांनी शाहीरी जलशा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणू साबळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाल्या की,”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील संघाच्या शाखेला भेट देऊन केलेले विधान हे कोणत्याही दबावापोटी केलेले नव्हते. तर त्या विधानाला सामाजिक आणि राजकीय अधिष्ठान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला नाही, तर हिंदू धर्मातील विकृत रूढी-परंपरांचा विरोध केला होता.”तर सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे यांनी केले, परिषदेच्या शेवटी शिवानंद चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *