पुणे दि.१६ (सिटीनामा वृत्तसेवा)
ज्ञानज्योती मुक्ता साळवे बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संचालित मातंग साहित्य परिषद पुणे यांचे वतीने ‘महापुरुषांच्या विचारातून समता आणि समरसतामय राष्ट्राकडे’ या विशेष परिसंवादाचे आयोजन रविवार दि.२२ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचे वीर बाजी पासलकर स्मारक, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड पुणे ३० येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.
पतीतपावन मंदिर वर्धापन दिनानिमित्य, संत रोहिदास महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी,राजे उमाजी नाईक पुण्यतिथी निमित्याने या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भटके विमुक्त आयोग भारत सरकारचे मा.अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते राहणार आहेत. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश यांचे बीजभाषण होणार असून अभ्यासक व विचारवंत अक्षय जोग, सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे, साहित्यिक अँड.आनंद गवळी, अभ्यासक प्रा.विनोद सूर्यवंशी हे मान्यवर वक्तेही परिसंवाद आपले विचार प्रकट करणार आहेत. समरसता गतिविधीचे मुकुंद आफळे, शरद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या विशेष परिसंवादाला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक डॉ. धनंजय उर्फ धनाजी सोमनाथ भिसे, मातंग साहित्य परिषद पुणे यांनी केले आहे.
