लोकशाहीत संवाद टाळणे कोणत्याही सरकारसाठी हितावह नाही – डॉ.बोधनी

Share this News

-सिटीनामा संवाद
-वाचकांच्या प्रतिक्रिया

पुणे दि.१६ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
लोकशाहीमध्ये मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र मतभिन्नता असली तरी संवादाचा मार्ग कधीही बंद होता कामा नये. इतिहास साक्षी आहे की, जनतेच्या भावना आणि आंदोलनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक सरकारांना त्याची राजकीय किंमत मोजावी लागली आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा चुका केल्या आणि त्याचे परिणामही भोगले. त्यामुळे अशाच प्रकारची चूक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने करू नये, अशी प्रामाणिक अपेक्षा असल्याचे मत सिटीनामा न्यूज चे वाचक, हितचिंतक डॉ.सचिन बोधनी यांनी सद्य परिस्थितीवर व्यक्त केले.

पुढे बोलतांना डॉ.सचिन बोधनी म्हणाले,सोनम वांगचुक यांच्या प्रत्येक मागणीचे समर्थन करतो, असे नाही. त्यांच्या सर्व मागण्या योग्यच आहेत, असा माझा दावा देखील नाही. परंतु एखादी व्यक्ती लोकशाही मार्गाने, अहिंसेच्या माध्यमातून उपोषणासारखे आंदोलन करत असेल, तर तिच्याशी संवाद साधणे ही सरकारची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे.

सरकारने सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करावी आणि त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घ्याव्यात. जर त्यांच्या मागण्या जनहिताच्या आणि व्यवहार्य असतील, तर त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. आणि जर त्या मागण्या व्यवहार्य नसतील किंवा त्यामध्ये कायदेशीर अथवा प्रशासकीय अडचणी असतील, तर त्या स्पष्टपणे समजावून सांगून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा.

लोकशाहीमध्ये सरकारची ताकद विरोधकांकडे दुर्लक्ष करण्यात नसते, तर विरोधी मतांनाही सन्मानपूर्वक ऐकून घेण्यात असते. संवाद हा कमकुवतपणाचे नव्हे, तर परिपक्व आणि आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाचे प्रतीक असतो.

आज देशाला संघर्षापेक्षा संवादाची आणि दुराव्यापेक्षा विश्वास निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. सरकारने पुढाकार घेऊन संवाद सुरू करावा, अशी माझी विनंती आहे. यामुळे केवळ एका आंदोलनाचा प्रश्न सुटणार नाही, तर लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल.

ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधार्थ नसून, लोकशाही मूल्ये, संवादाची परंपरा आणि जबाबदार शासनव्यवस्था यांच्यावरील विश्वासातून मांडलेली आहे. अलीकडील वृत्तांनुसार सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असून संवादाची मागणीही विविध स्तरांतून होत आहे.

-डॉ. सचिन बोधनी
समस्त ब्राह्मण संघ, पुणे, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *